Tur farming : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पोखरी हे गाव शिवना टाकळी उजव्या काळव्यामुळे बागायती पट्ट्यात मोडते. अवघ्या २२००-२३०० लोकसंख्येचे हे छोटेसे गाव आज महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, कपाशी, मका, सोयाबीन, ऊस यांसारख्या पारंपरिक नगदी पिकांना मागे टाकत गावात तब्बल ५० एकरहून अधिक क्षेत्रावर गोदावरी (बिडीएन २०१३-४१) वाणाची तूर फुलली आहे.
या परिवर्तनाची सुरुवात झाली शेतकरी वाल्मिक कारभारी माळकर यांच्या धाडसी प्रयोगातून. २०२२-२३ मध्ये त्यांनी सोशल मिडियावरून मिळालेल्या माहितीनुसार कृषी सहाय्यक व विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे मार्गदर्शन घेतले. कमी पावसात, अल्प नियोजन असूनही त्यांनी गोदावरी वाणाची लागवड केली आणि पहिल्याच वर्षी एकरी तब्बल ८ क्विंटल उत्पादन मिळवले.
गतवर्षी त्यांनी दीड एकर क्षेत्रावर ४ फुट बाय २ फुट अंतराने लागवड केली. ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन, शेंडा खुडणी यांचा योग्य वापर करून त्यांनी तब्बल १६ क्विंटल उत्पादन घेतले. हा अनुभव त्यांच्या आत्मविश्वासाला नवा उभारी देणारा ठरला.
यंदा त्यांनी वडीलोपार्जित ११.५ एकर क्षेत्रापैकी २ एकर क्षेत्रावर तुरीची लागवड केली आहे.
खत व्यवस्थापन: एकरी दोन बॅग १०:२६:२६ खत
शेंडा खुडणी: ४५-५० व ६५-७० दिवसांनी दोन वेळा
संरक्षण उपाय: शेंगा भरणीच्या सुरुवातीला बुरशीनाशकाची फवारणी
या सर्व उपाययोजनांमुळे त्यांना यंदा ३०-३२ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे.
✨ महत्त्वाचे परिणाम
गावात तुरीचे क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाची नवी दिशा मिळाली.
डाळीचा स्थानिक पुरवठा वाढून अन्नसुरक्षेला हातभार लागला.
ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन आणि शेंडा खुडणी यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आधुनिकतेकडे वाटचाल करत आहेत.
- शेतकऱ्यांच्या अडचणी
दिवसेंदिवस मंजूरांची समस्या बिकट होत चालली आहे.
विविध पिकांचे उत्पादन घेत असतानाही उत्पादन खर्च वाढला आहे.
बाजारातील अनियमित दरांमुळे शेतकरी मोठ्या मेटाकुटीला आले आहेत.
या सर्व अडचणींवर तोंड देत असताना पोखरी शिवारात शेतकरी वाल्मिक माळकर यांच्या प्रयत्नांमुळे आलेली गोदावरी तूर शेतकऱ्यांना नवा आधार देत आहे.
🛒 थेट ग्राहकांपर्यंत जाण्याची तयारी
तुरीचे क्षेत्र वाढत असताना सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे भाव ढासळण्याची शक्यता असते.
शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे की तुरीला पर्याय शोधावा.
माळकर यांचे मत:
“दर तुरीचे कमी होऊ शकतात, पण तूर डाळीचे दर कधीच कमी होत नाहीत.”
“आम्ही दालमिलद्वारे तूर प्रक्रिया करून थेट ग्राहकांना डाळ विकू. तोटा घेणार नाही.”
Source :- Krishi24.com