Give a missed call to order – 9096633907

पशुपालकांनो सावधान! कासदाहापासून गाई-म्हशींचे असे करा संरक्षण…
Cattle breeder

Cattle breeder : सध्या पावसाचे प्रमाण वाढले असून, काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या हवामानाचा जनावरांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असून, विशेषतः गाई आणि म्हशींमध्ये कासदाह या आजाराचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोठ्यांतील स्वच्छता व दैनंदिन काळजी याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

कासदाह हा रोग बहुधा पावसाळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. गोठा ओला असल्यास गाई किंवा म्हशी ज्या ठिकाणी बसतात, त्या ठिकाणी जंतूंची वाढ होते. परिणामी कासेला संसर्ग होतो आणि कास कायमस्वरूपी खराब होण्याचा धोका निर्माण होतो. अनेक वेळा गाई किंवा म्हशी मुक्त गोठ्यामध्ये बाहेरच्या मोकळ्या जागेत बसतात, जिथे पाणी साचलेले असते. अशा ठिकाणी संसर्गाचा धोका आणखी वाढतो.

या आजारापासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना अमलात आणाव्यात:

१. गोठ्यामध्ये ओलसर जागांवर कोळशाची राख टाकावी, जेणेकरून तिथे जंतूंची वाढ होणार नाही.

२. दूध काढण्यापूर्वी व नंतर कासेची स्वच्छता करावी. यासाठी जंतुनाशक द्रावण वापरणे आवश्यक आहे.

३. जनावरांच्या आहारात झिंक या खनिजाचे प्रमाण वाढवावे, कारण झिंकचा अभाव असलेल्या जनावरांमध्ये कासदाहाचा धोका अधिक असतो.

४. जनावरांना नेहमी कोरड्या व स्वच्छ जागी बसू द्यावे. ओल्या जागांवर बसल्यास संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

५. पोटात आम्लता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, कारण त्यामुळे जनावरे अधिक आजारी पडू शकतात.

६. जनावरांना आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा, रोग होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय अधिक परिणामकारक असतात. त्यामुळे गोठ्याचे व्यवस्थापन, आहार व स्वच्छतेकडे कायम लक्ष देणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात गोठ्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास केवळ कासदाहच नव्हे तर इतर संसर्गजन्य रोगांचाही धोका वाढतो. त्यामुळे पशुपालकांनी या काळात विशेष काळजी घेऊन जनावरांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे. निरोगी जनावरे हेच दूध उत्पादन वाढण्याचे मुख्य कारण असल्याने त्यांचे आरोग्य संरक्षण ही शाश्वत शेतीची गरज आहे.

Source :- krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *